मॉम (२०१७) - एका आईचा लढा

चित्रपटसृष्टीतलं पुनरागमन कसं असावं ते श्रीदेवीकडे पाहून कळतं. 'आखरी रास्ता’ चित्रपटात सुपरस्टार अमिताभ बच्चनची नायिका असूनही आपल्या वाट्याला आलेली दुय्यम भूमिका साकारल्यानंतर "अमिताभ सोबत काम करताना दुय्यम भूमिका मिळाल्यास चित्रपट करणार नाही", असं म्हणणाऱ्या श्रीदेवीने अनेक वर्षं चित्रपटसृष्टीपासून दूर राहिल्यानंतर नव्याने चित्रपटात अभिनय करताना देखील आपल्या वयाला साजेशी आणि नायिका प्रधान भूमिकाच निवडली.

ग्लॅमरचा लवलेश नाही पण स्वत्वाची जाणीव असलेली ’इंग्लिश-विंग्लिश’ चित्रपटातील श्रीदेवीची ’शशी गोडबोले’ प्रेक्षकांना भावली. आता त्यानंतर आलेला ’मॉम’ हा चित्रपट देखील श्रीदेवीच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना चित्रपटगृहात न खेचेल तरच नवल.

देवकी ही एक मध्यमवयीन स्त्री आहे. आर्या ही तिची सावत्र मुलगी आहे. आर्या आजदेखील आपल्या सख्ख्या आईला विसरू शकलेली नाही त्यामुळे देवकीने आपल्या आईची जागा घ्यावी हे तिला आवडलेलं नाही. देवकीला मात्र वाटतं कि कधी ना कधीतरी आर्याला देवकीची आईची माया कळून येईल पण तो दिवस येण्याआधीच असं काही घडतं कि देवकी आणि आर्यामधलं अंतर आणखीन वाढतं. आपण आर्याच्या मनात कधीही आईचं स्थान मिळवू शकणार नाही हे देवकीला कळून चुकतं पण त्याचबरोबर आर्याची होणारी घुसमट आई म्हणून देवकीला अस्वस्थ करून जाते.

चित्रपटाची कथा परिचित असली तरी कथेची मांडणी आणि दिग्दर्शन कथेबद्दल उत्सुकता निर्माण करतात. चित्रपटातील विशिष्ट प्रसंगांना दिलेलं पार्श्वसंगीत परिणामकारक आहे. एका प्रसंगात आर्याला पाहिल्यावर देवकीच्या मनाची जी अवस्था होते, ती दाखवताना श्रीदेवीने जो अभिनय केला आहे तो पाहून कोणतीही व्यक्ती देवकीच्या जागी स्वत:ला कल्पू लागेल. देवकीच्या भूमिकेत श्रीदेवीने अक्षरश: प्राण ओतले आहेत.

अक्षय खन्नाने साकारलेला इन्स्पे. मॅथ्यू फ्रान्सिस काही ठिकाणी नाटकी वाटतो पण नवाजउद्दीन सिद्दिकीचा दयाशंकर कपूर मात्र शेवटपर्यंत आपलं बेअरिंग कायम ठेवतो. इतर पात्रांची कामेदेखील ठिकठाक.

काही जुन्याच धाटणीचे प्रसंग असूनही दिग्दर्शक रवी उदयवार ह्यांनी ते आपल्या शैलीत चित्रीत केल्याने मनावर ठसतात. चित्रपटातील गाणी प्रसंगांना साजेशी आहेत पण ए.र. रेहमानने संगीतबद्ध केली आहेत असं वाटत नाही. गाण्यांव्यतिरिक्त कोणताही प्रसंग अधिक न ताणल्यामुळे आणि मोजक्याच संवादांमुळे चित्रपटाच्या कथानकावर प्रेक्षकांची पकड कायम राखली जाते. चित्रपटाचं मध्यंतर एका अश्या संवादानंतर येतं जिथे पुढे काय घडू शकेल ह्याची कल्पना येऊनदेखील प्रेक्षकांची उत्कंठा ताणली जाते.

एका साध्या, मितभाषी स्त्रीला जेव्हा आपल्या अपत्यसाठी लढा देण्याची वेळ येते, तेव्हा ती मागचा पुढचा विचार करत नाही. कारण तेव्हा ती फक्त आई असते. चित्रपटाची कथा जरी आई ह्या व्यक्तिरेखेभोवती गुंफलेली असली तरी चित्रपटाची हाताळणी एका सामाजिक समस्येवर आपल्याला पुन्हा पुन्हा विचार करायला भाग पाडेल हे नक्की.

Comments